उंबरे वेळापूर येथे दलित महिलेवर अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, आंबेडकरी समाजात संताप!

सोलापूर, दि. ४ जून २०२५: उंबरे वेळापूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. छगन निकम या बौद्ध महिलेला रघुनाथ भोसले या आरोपीने रस्त्यावर बेदम मारहाण केली, शिवीगाळ केली आणि शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स अकाउंटवरून व्हायरल झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.दीपक केदार यांनी पीडित महिलेशी फोनवर संपर्क साधून घटनेचा तपशील जाणून घेतला. पीडितेने सांगितले की, “गावात जय भीम म्हणणारे आमचे एकमेव घर आहे, त्यामुळे मला टार्गेट केले गेले. आरोपीने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आणि मारहाण केली.” विशेष म्हणजे, आरोपी अद्याप मोकाट फिरत असून, त्याचा रक्तदाब कमी झाल्याचे कारण देऊन पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही, असे पीडितेच्या निदर्शनास आले. यावर दीपक केदार यांनी तीव्र संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे.
**राज्य सरकार, गृहमंत्री, महिला आयोगाकडे दखल घेण्याची मागणी**
दीपक केदार यांनी राज्य सरकार, गृहमंत्री, महिला आयोग आणि अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “राज्यात दलित महिला सुरक्षित नाहीत. यापूर्वी रांजणगाव गणपती येथे ‘जय भीम’ गोंदलेल्या महिलेच्या तिहेरी हत्याकांडाची पाच दिवस उलटूनही पोलिसांना आरोपींचा शोध लागलेला नाही. दलितांचे मरण स्वस्त आहे का? दलित महिलांवरील अन्यायाकडे सरकार आणि महिला आयोग दुर्लक्ष करणार का?”त्यांनी आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई आणि पीडित महिलेला पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच, जर लवकरात लवकर आरोपीला अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. केदार लवकरच पीडित महिलेला भेटण्यासाठी उंबरे वेळापूर येथे जाणार असल्याचे त्यांनी पीडितेला फोनवर सांगितले आहे.
**सोशल मीडियावर आक्रमक प्रतिक्रिया, सरकारवर दबाव**
या घटनेनंतर सोशल मीडियावर आंबेडकरी समाज आणि नागरिकांकडून तीव्र संताप आणि निषेध व्यक्त होत आहे. अनेकांनी आक्रमक कमेंट्स आणि प्रतिक्रियांसह सरकारने ठोस पावले उचलून दलितांवरील अत्याचार थांबवावेत, अशी मागणी केली आहे. गृह विभाग आणि राज्य सरकारने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या घटनेने पुन्हा एकदा दलित समाजावरील अत्याचार आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आता सरकार आणि संबंधित यंत्रणा काय पावले उचलतात, याचेकडे लक्ष लागले आहे.