आंबेडकरी चळवळ आणि सत्तेचा संघर्ष: स्वाभिमान की प्रॅक्टिकल राजकारण?

चळवळ ही स्वाभिमान, नीतिमत्ता आणि तत्त्वांवर आधारित सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तनाची चळवळ आहे. या चळवळीचा आत्मा भावना आणि स्वाभिमान यात दडलेला आहे. मात्र, आजच्या राजकीय परिस्थितीत, जिथे सत्ताच सर्वस्व मानली जाते, तिथे ही चळवळ सत्तेच्या जवळ जाण्यासाठी धडपडत आहे, पण तत्त्वांशी तडजोड करायला तयार नाही. “सत्ता नसली तरी चालेल, पण स्वाभिमान टिकला पाहिजे,” ही समाजाची ठाम भूमिका आहे. पण प्रश्न असा आहे की, जिथे सत्य, तत्त्व, विचार आणि संवेदना यांना स्थान नाही, तिथे स्वाभिमानाच्या बळावर सत्ता कशी मिळवायची?
आजच्या राजकारणात सत्ता हस्तगत करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर सर्रास होत आहे. नुकतेच छगन भुजबळ यांच्या मिमिक्रीच्या व्हायरल क्लिप आणि अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर त्यांचा भाजपशी हातमिळवणी करून अर्थमंत्रीपद मिळवण्याचा प्रसंग याची साक्ष देतो. या प्रॅक्टिकल राजकारणात तिजोरीवर ताबा मिळवणे हेच अंतिम ध्येय दिसते. ही तिजोरी शेतकरी, मजूर, शोषित आणि वंचित यांच्या घामातून आणि करातून भरली जाते.
पण त्याच तिजोरीवर कब्जा मिळवण्यासाठी प्रस्थापितांचे राजकारण कोणत्याही तत्त्वाशिवाय पुढे सरकते. याउलट, आंबेडकरी चळवळीत नीतिमत्ता आणि तत्त्वांना प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे सत्तेच्या जवळ जाता येत नाही.आजच्या राजकीय परिदृश्यात पक्षांचे धोरण “वापरा आणि फेका” असे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांसारख्या पक्षांमध्ये कोण कोणत्या गटात आहे, हे समजणे कठीण झाले आहे. अशा वेळी आंबेडकरी चळवळीसमोर गंभीर प्रश्न आहे: सत्तेसाठी तत्त्व सोडायचे की स्वाभिमान जपायचा? चळवळीला मतांची ताकद हवी, पण ती कशी मिळवायची? तत्त्वज्ञान आणि वैचारिक चर्चा रूममध्ये बंदिस्त राहतात, पण प्रत्यक्ष राजकारणात प्रयोगशीलता हवी.
प्रत्येक पक्ष हा कोणत्या ना कोणत्या जातीचा किंवा धर्माचा वाहक बनला आहे, पण दलित आणि आदिवासी यांचा पक्ष कोणता? त्यांचा वापर फक्त मतांसाठी होतो आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडले जाते.सत्तेची तिजोरी हस्तगत करण्यासाठी आंबेडकरी चळवळीने आपला पक्ष निर्माण करणे गरजेचे आहे. केवळ तत्त्वज्ञानाने सत्ता मिळत नाही; त्यासाठी राजकीय प्रयोग आणि एकजूट आवश्यक आहे. इस्रोच्या अपयशानंतरही प्रयोग थांबले नाहीत, तसेच चळवळीनेही प्रयोगशील राहायला हवे. पण सध्या चळवळीत एकलवाद दिसतो.
प्रत्येकजण स्वतःलाच बाबासाहेबांचा वारसदार मानतो, आणि इतरांचे प्रयोग हसण्याचा विषय बनतात. अशा वेळी आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारतो आहोत. शत्रू याचा फायदा घेतो, आणि आपणच आपल्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करतो.आता प्रश्न आहे: पुढे कसे जायचे? स्वाभिमान आणि तत्त्व जपत सत्तेची तिजोरी मिळवण्यासाठी चळवळीने स्वतःचा राजकीय पक्ष उभा करावा, की प्रस्थापित पक्षांच्या मागे लागावे? ग्वालेरच्या पुतळ्याच्या मुद्द्यावर कोणता पक्ष खंबीरपणे बोलला? सामाजिक न्यायाच्या निधीसाठी कोण लढत आहे? जो पक्ष बोलतो, त्यांच्यावर शंका घेतली जाते. ही मानसिकता चळवळीला मागे घेऊन जाते.
आता वेळ आहे स्वतःचा मार्ग शोधण्याची, स्वतःचा पक्ष उभा करण्याची आणि प्रयोगशीलतेने सत्तेच्या दिशेने वाटचाल करण्याची. स्वाभिमान आणि तत्त्व जपताना राजकीय ताकद निर्माण करणे हाच खरा मार्ग आहे. अन्यथा, केवळ तत्त्वज्ञानाच्या गप्पांनी सत्ता मिळणार नाही. चळवळीने एकजुटीने आणि प्रयोगशीलतेने पुढे जावे, तरच बाबासाहेबांचे स्वप्न साकार होईल.