लातूरमधील दलित कुटुंबावरील क्रूर हल्ला: ऑल इंडिया पॅंथर सेनेची फास्टट्रॅक कोर्ट आणि आर्थिक मदतीची मागणी!

लातूर, 22 जून 2025: लातूरच्या म्हाडा कॉलनी, बाबळगाव रोड येथे 16 जून 2025 रोजी गणेश उत्तम सूर्यवंशी यांची 10 जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकून क्रूरपणे हत्या केली. केवळ 50 रुपयांच्या उधारीच्या वादातून गणेश यांच्या भाच्याच्या पान टपरीवर हा हल्ला झाला. या घटनेने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गणेश सूर्यवंशी यांच्या पश्चात त्यांची पत्नी अश्विनी, तीन लहान मुले (एक मुलगी, दोन मुलगे) आणि वडील असा परिवार आहे. घरातील एकमेव कमवती व्यक्ती गमावल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मातंग समाजातील या दलित कुटुंबावर झालेल्या हल्ल्याने राज्यातील दलितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
ऑल इंडिया पॅंथर सेनेचा आंदोलनाचा इशाराऑल इंडिया पॅंथर सेनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत राज्य सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत:
या प्रकरणातील सर्व आरोपींवर फास्टट्रॅक कोर्टाद्वारे तात्काळ सुनावणी करून फाशीची शिक्षा सुनिश्चित करावी.
गणेश सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक आणि सामाजिक मदत पुरवावी.
दलितांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत.
सेनेचे नेते यांनी सांगितले, “लातूरच्या या घटनेने दलित समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा धाक राहिलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. शस्त्रांचा वापर सहज होत आहे. सरकारने तात्काळ कारवाई न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू.” कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हया घटनेने महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची पोलखोल केली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषत: दलित आणि मागासवर्गीय समाजातील नागरिकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने सामाजिक तणाव वाढत आहे.
ऑल इंडिया पॅंथर सेना लवकरच गणेश सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट देणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी घटनेचा निषेध केला आहे!