राज्यात खळबळ उडवणारी दीपक केदार यांची फेसबुक पोस्ट; बुलडोझर कारवाईवर सवाल

मुंबई | प्रतिनिधी
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमुळे राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. बुलडोझर कारवाई, अशोक खरात प्रकरण आणि काही राजकीय नेत्यांच्या भूमिकेबाबत त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.
दीपक केदार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कॉर्पोरेट जिहाद हा मुद्दा मुद्दाम जन्माला घातला गेला कारण त्यांना अशोक खरात प्रकरण दडपायचे होते आणि ते त्यात यशस्वी झाले आहेत.” तसेच त्यांनी निदा खानला मदत केल्याच्या आरोपावरून मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्याचा प्रयत्न होत असल्याचा उल्लेख केला आहे.
याचबरोबर त्यांनी प्रशासन आणि सरकारला सवाल करत विचारले की, “अशोक खरातची वॉल कंपाऊंड सुद्धा पाडू शकलेले नाहीत. अशोक खरातचे घर, मठ यावर कधी बुलडोझर चालणार? याचे उत्तर कोण देणार?”
दीपक केदार यांनी पुढे “त्या 39 आमदारांचे काय झाले? याचे उत्तर कोण देणार?” असा सवाल उपस्थित करत भाजप नेते यांनी अशोक खरात यांची भेट घेतल्याचा उल्लेख केला. “त्यांच्यावर कोणती कार्यवाही झाली? काय चौकशी झाली?” असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, दीपक केदार यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत असून समर्थक आणि विरोधकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. काहींनी त्यांच्या भूमिकेला समर्थन दिले असून काहींनी या वक्तव्यांवर आक्षेप घेतला आहे. मात्र, संबंधित प्रकरणांवर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.



