नागवंशीय हे इथल्या सोन्याचे आणि विचारांचे रक्षक म्हणून उभे राहतात.

तंगलान काही निरिक्षणे :
१. जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या धनाला गुप्तधन असे म्हणतात. हे गुप्तधन प्रामुख्याने सोन्याच्या रूपात आढळून येते आणि त्या गुप्तधनावर कोणता तरी नाग त्याची राखण करत असतो, अशी गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत; परंतु या मागचा खरा इतिहास असा आहे की, त्या सोन्याचे रक्षण करणारा नाग हा कोणी साप नसून इथले मूल नागवंशीय लोक आहेत.
२. या नागवंशीय लोकांचा प्रमुख ही एक महिला दाखविलेली आहे. याचाच अर्थ असा की नागवंशीय लोक मातृसत्ताक पद्धतीने आपले जीवन व्यतीत करत होते.
३. जम्बूद्विपावरील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संघर्ष हा बुद्धवाद आणि ब्राह्मणवाद यांच्यातला आहे. आताच्या भारतीय व्यवस्थेत सांस्कृतिक संघर्ष हा मुस्लिम विरुद्ध हिंदू असा दाखविल्या जात असला तरीही तो मूळ संघर्ष बौद्ध आणि सनातन ब्राह्मण धर्म यांचे विरोधातला आहे.
४. इथल्या व्यवस्थेमध्ये बुद्ध विचार आणि बुद्ध संस्कृती संपवण्याचे काम ब्राह्मणांनी केलेले आहे. हे काम त्यांना एकट्यांना करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी हे काम क्षत्रियामार्फत करवून घेतले आहे. जात व्यवस्था सुद्धा इथल्या मातीत अशाच पद्धतीने रुजवली गेली आहे.
५. कथेचा नायक हा स्वाभिमान आणि सन्मानाच्या मार्गाने जातो. हा इथल्या मूळ नायकाचा स्वभाव आहे. त्यामुळे भारताचा इतिहासा नेहमीच रक्तरंजित राहिलेला आहे.
६. तंगलान सिनेमात महिलांच्या आणि पुरुषांच्या शरीरावर विविध आकृती आणि चिन्हे दाखवलेली आहेत. त्यामधून इथल्या इतिहासाचे दाखले मिळतात. एका स्त्रीच्या उजव्या दंडावर पिंपळाचे पान कोरलेले आहे जे बौद्ध संस्कृतीची खूण आहे. त्यातून बौद्ध संस्कृती इथल्या मूळ लोकांनी आपल्या विविध कलामधून जिवंत ठेवल्याचे उदाहरण पहावयास मिळते..
७. इथल्या मूळ लोकांना गुलाम बनून त्यांची विविध जातीत विभागणी करून ब्राह्मण आणि क्षत्रीयवर्गांनी त्यांच्याकडून आपले काम करून घेतले; परंतु इथल्या मूळ लोकांना पोटाचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे त्यांनी आपला इतिहास विसरून शत्रूंना मदत केली. ही मदत करण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडे उत्पादनाचे साधन नव्हते आणि जे थोडे उत्पादनाचे साधन होते त्यावर गावातील सावकाराची मालकी होती. याच कारणाने त्यांना गुलामी स्वीकारणे भाग पडले.
८. सिनेमात आरती ही नागवंशी तंगलानला आपला इतिहास वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते. खरंतर आरती ही त्याच्यासाठी प्रेरणा आहे आणि त्याचे मूळ अस्तित्व त्याला दाखवून देण्यासाठी ती मार्गदर्शक ठरते.
९. तंगलानच्या मुलाचे नाव असोका असे आहे. हा अशोक विहिरीतून बुद्धाच्या मूर्तीचे तोंड बाहेर काढतो आणि जमीनीत असलेली बुद्ध मूर्ती शोधून त्याला ते तोंड जोडतो. पुन्हा बुद्ध या मातीवर उभा करतो. जमीनीत गाडलेला बुद्ध पुन्हा बाहेर काढतो.
१०. नागवंशीय परंपरा आपला इतिहास जिवंत ठेवून बुद्ध विचाराचे रक्षण करते आणि तोच संघर्ष सदर सिनेमात पाहायला मिळतो.
११. ऐतिहासिक संदर्भ सिनेमात वारंवार पाहायला मिळतात.
१२. आरतीचे पोट चिरून जेव्हा तिचे रक्त इथल्या जमिनीवर सांडते. तेव्हाच सोने मिळते. याचा लक्ष्यार्थ असा आहे की, नागवंशी यांची अमानुष हत्या केल्यानंतरच या जमिनीतील सोने विरोधकांना मिळाले. नागवंशीय हे इथल्या सोन्याचे आणि विचारांचे रक्षक म्हणून उभे राहतात.
हेमंत शारदा
Hemant Sharda Dinkar Sawale