लाल किल्ल्यावरून इतिहासाची मोडतोड स्वीकारणार नाही : ऑल इंडिया पँथर सेनेचा इशारा

नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर ऑल इंडिया पँथर सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात संविधान निर्मिती संदर्भात वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि तीन महिलांची नावे घेतली. यावर प्रतिक्रिया देताना पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार म्हणाले की,
“संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. इतर कुणाचेही नाव जोडून त्यांच्या योगदानावर पुसटसाही प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. हे केवळ अज्ञानता नाही तर इतिहासाची मोडतोड आणि महामानवाचे योगदान नाकारणारा कट आहे.”
केदार यांनी पुढे म्हटले की, संसदेत केवळ “जय भीम” घालून उपयोग नाही, तर सत्तेत असलेल्या SC/ST नेत्यांनी तातडीने पंतप्रधानांना जाब विचारला पाहिजे. नव्या दलित-बहुजन खासदारांकडून ठाम भूमिकेची अपेक्षा आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेने ठाम शब्दांत सांगितले की,
“संविधान निर्माते एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते आणि राहतील. आंबेडकरवादी बांधवांनी सतर्क राहावे, हा एक गंभीर इशारा आहे.”



