हुकूमशाहीने देशभक्तीचे नाटक करू नये… घर घर झेंड्याची पोलखोल करणारी कविता …

हुकूमशाहीने देशभक्तीचे नाटक करू नये…
महात्मा गांधीचा आता फक्त चश्मा दिसतो,
स्वच्छ भारत अभियानच्या जाहिराती बाथरूम,
रस्त्यांवरील मुताऱ्यांच्या भिंतीवर
तिरंग्यात गांधी चश्मा रंगत असतो,
“येते लघवी करू नका” हे रंगवण आता बंदच झालंय
स्वच्छ भारत अभियान गांधी चश्मा अन् तिरंगा रंगून मोकळं झालंय
आता घर घर तिरंगा नावाखाली
देशाच्या पवित्र झेंड्याचा सुद्धा कचरा होईल,
झेंड्याच्या आचारसंहिता धुळीस मिळतील,
भारत माता की जय म्हणत झेंडे लागतील खरे,
घर घर झेंडे लाऊन झाल्यावर ते झेंडे उखिरड्यावर दिसू नयेत.
देशांच्या प्रतिकांची अस्मिता विटांबली जाऊ नये.
जणू भारताचे नागरिक परीक्षा देत आहेत,
तू खरा देशभक्त की मी खरा देशभक्त ?
किती परीक्षा घेणार आहात?
नोटबंदी केलीत अन् लोक रांगेत मरत होती,
तेंव्हा तुम्ही त्यांना देशभक्त च म्हणलात ना,
ना सर्टिफिकेट ना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा?
तोंडी देशभक्तीचे सर्टिफिकेट देऊन मोकळे झालात?
किती परीक्षा घेणार आहात आमच्या देशभक्तीच्या?
कारोना काळात थाळ्या टाळ्या वाजवून दाखवली ना देशभक्ती?
जीवाची पर्वा न करता तुम्ही सांगितल्यावर थाळ्या घेऊन आलेच की बाहेर…
गंगेत तरंगणारे मृतदेह देशभक्तच होते ना,
शेतकरी आंदोलनात शहीद झालेले शेतकरी,
मंत्र्याच्या गाडीने चिरडून टाकलेले शेतकरी,
सामूहिक बलात्कार करून चिरडून टाकलेली मनीषा वाल्मिकी,
शिष्यवृत्ती रोखून संस्थात्मक हत्या केलेला रोहित वेमुला,
आरक्षणवादी म्हणून हिणवल्यावर फाशी घेतलेली पायल तडवी,
मॉब्ब लिंचींग नावाला जन्म घालून जयश्रीराम म्हणत मारलेले मुस्लिम,
गुजरातला स्कॉर्पिओ ला बांधून मारलेले दलित,
जेलमध्ये डांबलेले विचारवंत,
लेख लिहिला म्हणून मारलेली गौरी लंकेश,
दलित मिश्या कसा काय ठेवतो म्हणून मारलेला मेघवाल
घर नसलेला आदिवासी
काम नसलेला बेरोजगार,
आजही अंगावर पूर्ण कपडे नसलेल्या महिला,
गरीबांना उद्धवस्त करणारी महागाई,
व्यापाऱ्यांना संपवणारी आर्थिक नाकेबंदी,
भारत देशाच्या तरुणाची थट्टा करणारी चार वर्षाची अगिनिविर योजना,
अन्नधान्य खाण्यापिण्यावर लावलेली जीएसटी,
नव्या कामगार कायद्यामुळे गुलाम झालेला कामगार,
धार्मिक उनामादात दंगलीत मारलेले माणस,
पुलवामात मारले गलेले शहीद सैनिक,
ट्रंप आल्यावर झाकलेल्या झोपडपट्टीतले माणसं ,
डिग्रया घेऊन भजे विकायला लावलेले तरुण
हे सगळे लोक देशभक्तच आहेत ना,
याच नागरिकांचा भारत देश आहे ना,
याच नागरिकांचे भारतीय नागरिकत्व आहे ना…
सगळे देशभक्त होते हो…
तुम्ही कोणते देशभक्त शोधत आहात हा प्रश्न आहे?
हेमंत करकरे देशभक्त होता ना,
जस्टिस लोहया सुद्धा देशभक्त होते ना,
उगाच हा देशभक्तीचा इव्हेंट का?
जिथे घरचं नाही तिथे छताडात झेंडा रोवायचा का?
जिथं कुपोषण, भुकेने माणस मरतात तिथे,
त्या थरथरणाऱ्या हातात झेंडा धरण्याची ताकद तरी आहे का?
घर घर झेंडा नाही झाकू शकत,
ही खोट्या देशभक्तीने घेतलेले भारतीयांचे बळी,
देश चालवतोय इव्हेंट कंपनी नाही,
नाही कळणार तुम्हाला आमच्या वेदना,
आमची भूक अन् हाताला काम…
तुम्ही काय नवीन करताय, तुम्ही काय ठासून सांगताय?
देशभक्ती या आधी शिकवली नाही हो,
ती डीएनएत होती,
दबलेला, पिचलेला हा माणूस देशभक्तीच्या सणात सामील होतोच ना…
कंबरेला चड्डी मोठी होती म्हणून ,
करदुड्याला काडी गुंडाळून तो आलेलाच आहे,
शर्टला तांब्याने इशतरी करून तो उभा राहिलेलाच आहे,
सारी शाळा, सार गाव झाडून तो झेंडा वंदन करतच आहे,
फुपाट्याने भरलेला, जोरात आवाजात तोच,
“भारत माता की जय” म्हणतच आहे ना…
जन गण मन सुरू असताना जिथं आहे तिथं थांबायचं,
हे कुणी कुणाला शिकवलं नाही हो…
बघा की, डुकर पकडणारा फॅन्ड्री मधला झब्या
थांबलाच होता ना?
घर द्या म्हणजे झेंडा लावतील,
काम द्या, म्हणजे घोषणेसाठी आवाज निघतील…
देशप्रेम शिकवण्याची गरज नाही…
येते जेवण करायची ट्रेनिंग दिले जात नाही ना?
ती आपोआप येते कारण देशाचे आम्ही नागरिक आहोत,
लादू नका आणि हुकुमशाही गाजवू नका…
लोकशाही ला गुलाम करण्यासाठी लोकशाही प्रतिकाना हातात घेऊन हुकुमशाहीचा उगम करणारा भगवा सूर्य उगवु नका…
- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना