दीपक केदार यांचा सरकारला इशारा: ‘सत्तेची मस्ती उतरविण्यासाठी शेतकरी रूमणं तयार!

मोझरी: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, दिव्यांग, मागासवर्गीय, मजूर, घरकूल, रोजगार हमी योजना, पीक विमा आणि हमीभाव यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर तीव्र भाष्य करत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
केदार यांनी बच्चू कडू यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की आपल्याला पांढऱ्या दाढीचे कृषिमंत्री मिळाले. केंद्र आणि राज्यातील पांढऱ्या दाढीच्या नेत्यांनी देश आणि राज्याला घायाळ केले आहे. सत्तेची मस्ती डोक्यात चढली आहे. जर शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ झाली नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाच्या बळावर ही मस्ती उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”बच्चू कडूंच्या आंदोलनाचे मुद्दे आणि सरकारवर टीका
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी
बरोबरच रमाई घरकूल योजनेसाठी ५ लाख रुपये, सामाजिक न्याय विभागाच्या निधीचे योग्य वाटप, लाडली बहीण योजनेसाठी निधी वळवण्यावर बंदी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. केदार यांनी यावर बोलताना सांगितले की, सरकार लाडली बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा २९ हजार कोटींचा निधी वळवत आहे. “लाडली बहीण योजनेला आमचा विरोध नाही, पण सामाजिक न्यायाची हत्या करून लाडली बहीण यशस्वी होणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमुक्ती ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी ठणकावल
केदार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना ‘आधुनिक कोरोना’ संबोधत गंभीर चिंता व्यक्त केली. “१९८६ पासून शेतकरी आत्महत्या करत आहेत. दरवर्षी ३,००० शेतकरी गुदमरून मरतात. त्यांना वाचवण्यासाठी कोणताही ‘कोरंटाईन’ किंवा ‘सॅनिटायझर’ नाही. शेतकरी मरणाला कवटाळतो, तेव्हाच त्याला शांती मिळते. हे थांबले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी १९८६ मध्ये तुर्भे कुटुंबाने कीटकनाशक पिऊन सामूहिक आत्महत्या केल्याची आणि सोलापूरच्या शेतकऱ्याने ‘ही आमची शेवटची पिढी आहे’ असे सांगितल्याची उदाहरणे दिली.
केदार यांनी राज्य सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम देत म्हटले, “बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या केसालाही धक्का लागला, तर शेतकरी रोमण काय असतो, ते दाखवल्याशिवाय राहणार नाही.” त्यांनी सरकारवर जातीवाद आणि दंगली भडकवण्याचा आरोप करत, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांना वेळ नाही, पण दंगली आणि जातीवादासाठी त्यांची रांग लागते,” अशी टीका केली.
कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मराठा नेते मनोज जरांगे पाटील, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे नेते यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे विदर्भ समन्वयक गणेश सहस्त्रबुद्धे आणि युवा नेते संकेत जाधव यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन समर्थन व्यक्त केले. “बच्चू कडू हे शेतकरी, मजूर, दिव्यांग आणि वंचितांसाठी लढणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी नेहमीच अधिवेशनात शोषितांचे मुद्दे मांडले,” असे केदार यांनी नमूद केले.
पाच दिवसांहून अधिक काळ अन्नत्याग करणाऱ्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाने विदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा चर्चेत आणले आहेत. दीपक केदार यांनी शेतकरी आणि दलितांना आवाहन केले की, “आता लढलो नाही, तर गुलामी आपल्या दारात आहे. बच्चू कडूंसारख्या लढणाऱ्या नेत्याला बळ द्या.” त्यांनी प्रहार संघटनेसोबत खांद्याला खांदा लावून लढण्याची ग्वाही दिली.
इंडिया पँथर सेनेने बच्चू कडू यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. “शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाणार नाही. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर शेतकरी रोमण सत्तेचा नायनाट करेल,” असा कडक इशारा केदार यांनी दिला.या आंदोलनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले असून, सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.