बीड मांडेखेल येथे पोलिस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू; ऑल इंडिया पँथर सेनेचा तीव्र निषेध!

बीड (प्रतिनिधी) – बीड येथील मांडेखेल मैदानावर सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान दीपक वाहुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. सकाळी ५ वाजल्यापासून मैदानावर उपस्थित असलेल्या उमेदवाराला दुपारी सुमारे १ वाजता १६०० मीटर धावण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास आठ तास उमेदवारांना उपाशीपोटी व पुरेशा पाण्याविना थांबविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
धावण्याचा वेग मोजण्यासाठी उमेदवारांच्या शरीरावर चिप लावण्यात आल्याचे सांगितले जाते. या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आरोग्य व सुरक्षिततेची पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच मैदानावर पुरेशा वैद्यकीय सुविधा, नाश्ता-पाणी व्यवस्था आणि विश्रांतीची सोय नसल्याचेही सांगितले जात आहे.
दीपक वाहुळे यांच्या कुटुंबीयांना सुरुवातीला “चक्कर आली” असे सांगण्यात आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. त्यानंतर मृतदेह सुपूर्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ॲम्ब्युलन्ससाठी कुटुंबियांनाच पैसे द्यावे लागल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याने असंवेदनशीलतेचा आरोप होत आहे.
दरम्यान, ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. “देशसेवेच्या भावनेतून भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा असा मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची न्यायालयीन किंवा उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी आणि कुटुंबाला तात्काळ न्याय द्यावा,” अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.
संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- कुटुंबाला किमान १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
- कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.
- भरती प्रक्रियेत मूलभूत सुविधा, वैद्यकीय तपासणी आणि सुरक्षित वातावरणाची हमी द्यावी.
सध्या राज्यभरातून सुमारे १८ लाख उमेदवार १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. परीक्षा शुल्कातून मोठ्या प्रमाणावर निधी जमा होत असताना उमेदवारांना निवास, पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची टीका होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश द्यावेत व भरती प्रक्रियेत मानवीय दृष्टिकोनातून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
पीडित कुटुंबाची भेट घेताना आई दुःखाने कोसळली होती, तर वडील व भाऊ यांनी न्यायाची मागणी केल्याचेही सांगण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



