महादेव मुंडेला न्याय देणे हा मानवतेचा लढा – नितीन सोनवणे यांचे बीडमध्ये संघर्षात्मक भाष्य!

बीड | प्रतिनिधी महादेव मुंडे हत्याकांडाला 21 महिने उलटून गेले, तरीही आरोपी अजूनही फरार आहेत. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आयोजित केलेल्या मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील व्यापक बैठकीत ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते व बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी ठाम भूमिका मांडत, “महादेव मुंडेला न्याय देणे हा केवळ एक लढा नसून मानवतेचा प्रश्न आहे” असे जोरदार वक्तव्य केले.नितीन सोनवणे यांनी स्पष्ट केले की, “महादेव मुंडे हे वंजारा समाजातील नवोदय उद्योजक होते. त्यांच्यावर झालेला अन्याय हा संपूर्ण समाजावर झालेला आहे. त्यांच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत हालअपेष्टांमध्ये असून, आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत.”
या बैठकीत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांची उपस्थिती नसली तरी त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत स्पष्ट केले की, नितीन सोनवणे हे त्यांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी यापूर्वीही महादेव मुंडे यांच्या कुटुंबाच्या उपोषणाला भेट देत साथ दिली होती. विशेषतः जेव्हा ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी विष प्राशनाचा टोकाचा निर्णय घेतला, त्यावेळी दीपक केदार हे सर्वात प्रथम ताईंची भेट घेणारे होते.
दीपक केदार यांनी ठामपणे म्हटले आहे की, “आम्ही या लढ्यात सुरुवातीपासून आहोत आणि शेवटपर्यंत राहणार. येणाऱ्या आंदोलनांमध्ये मी स्वतः सहभागी होणार असून, महादेव मुंडे यांचे कुटुंब, त्यांचे वडील आणि आई यांच्यासोबत ताकदीने उभे राहणार आहोत.” तसेच त्यांनी राज्य सरकार व गृहमंत्र्यांना इशारा दिला की, “आमच्यावर रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नका.
“संपूर्ण बैठकीत महादेव मुंडे प्रकरणाचा राज्यव्यापी लढ्यात रूपांतर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखीने या लढ्याला साथ देण्याचा निर्णय घेतला असून, न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले.



