बुलढाण्यात ऑल इंडिया पॅंथर सेनेचा एल्गार; पातुर्डा भूमीत स्मारकासाठी संघर्षाचा इशारा!

बुलढाणा, दि. २५ मे २०२५: संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक दि. २४ मे २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या कार्यावर विश्वास ठेवत विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्ते, वयोवृद्ध, आणि महिलांनी जाहीर प्रवेश करत चळवळीला पाठबळ दिले. बुलढाणा जिल्हा पॅंथरमय करणारी ही बैठक चळवळीला नवीन ऊर्जा देणारी ठरली.
पातुर्डा गावात बाबासाहेबांनी स्वतः येऊन विहिरीचे पाणी सर्वांसाठी खुले केले होते. या ऐतिहासिक भूमीत स्मारकाची घोषणा अनेक नेत्यांनी केली, परंतु प्रत्यक्षात स्मारक आजही ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. याबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत स्मारकासाठी केवळ दीपक भाई केदारच पुढाकार घेऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पॅंथर सेना उतरणार असून, नागरिकांनी खंबीरपणे पाठिंबा दर्शवला.
बैठकीत बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय भाई वानखडे यांनी जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न आणि पातुर्डा येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर प्रकाश टाकला. पातुर्डा भूमी राष्ट्रीय स्मारक व्हावी यासाठी पॅंथर सेना रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा त्यांनी दिला. विदर्भ नेते संकेत भाई जाधव यांनी संघटना बांधणीसाठी मार्गदर्शन केले.
विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांनी बुलढाणा जिल्हा आणि संग्रामपूर तालुक्यातील सर्कल वाईस गावांचा आढावा घेत युवकांना पुढे येण्याचे आवाहन केले. “बाबासाहेबांनी चार लेकरं गमावून मतदानाचा अधिकार दिला. तो स्वाभिमानाने वापरला पाहिजे. पाचशे रुपये घेऊन मतदान करणं थांबवा. रस्त्यावरचा संघर्ष करणारा माणूसच समाजाचे प्रश्न सोडवू शकतो,” असे त्यांनी सांगत उपस्थितांना प्रेरित केले.
या बैठकीला जिल्हा आणि तालुक्यातील शेकडो पॅंथर कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित पॅंथर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक-राजकीय वाटचालीस क्रांतिकारी शुभेच्छा देण्यात आल्या.
बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय वानखेडे यांचं अतिशय सक्रिय कार्य असून त्यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यात पँथर मजबुतीने उभा राहत आहे