भीमाकोरेगाव स्तंभ, दीक्षाभूमि, चैत्यभूमी येतील दलाल हद्दपार करा, दलाल हाताशी धरून मनुवादी “कोंबडा झुंज” लावते!

दीक्षाभूमी, चैत्यभूमी येते पैसा सरकारी तिजोरीतला, जनतेच्या घामाचा, नियोजन सरकारी प्रशासनाचे मग हे दलाल तिथे असं कोणतं काम करतात? अस्मितेच्या प्रतिकांच्या ठिकाणी दलाली करून यांची प्रॉपर्टी करोडो रुपयांची झाली.
या स्वयंघोषित समिती वाल्यांच्या प्रॉपर्टी तपासा मग यांच्या गुडघ्यावरच्या अभिवादनामागे काय गोड बंगाल आहे ते कळेल. आमच्या उद्रेकानंतर सरकारचा यावर्षी मोठा रोल राहिला आणि सोईसुविधा दिसल्या, दलालांचा खेळ आम्ही गुंडाळला…
एक नियोजनाचे पॅकेज सरकार जाहीर करतं, मग आपल्यातच समित्यांच पेव उठतं, त्यात कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी, मलिदा खाण्यासाठी “कोंबडा झुंज” मनुवादी लावतात आणि आपण आपल्या बापाच्या टाळूवरच लोणी खाण्यासाठी, श्रेय घेण्यासाठी धडपडतो. मनुवादी त्यांचा अजेंडा आपल्याच लोकांच्या हाताने राबवतात हे सुध्दा आपल्याला कळत नाही.
सरकारचा निधी होता, प्रशासनाचे कष्ट होते, पोलिसांचे संरक्षण होते मग राज्यपाल कोषियारी ठराविक एका व्यक्तीचे नाव घेऊन त्याला श्रेय कसे काय देतात? हे नाव घेण्यामागे समाजात फूट पाडण्याचा अजेंडा आम्हाला दिसतो. हे डाव आपण ओळखले पाहिजेत अन्यथा “कोंबडा झुंज” लाऊन आपण सगळे रक्तबंबाळ जखमी होऊ हे लक्ष्यात घ्या.
काय वायरल करायचं याच भान ठेवा, चैत्यभूमी तील एक काही सेकंद चा व्हिडिओ वायरल करून आणि त्यावर चर्चा करून आपण काय साध्य केलं? भैय्यासाहेब आंबेडकर, आंबेडकर परिवार यांच्या संदर्भातील ऑडियो क्लिप आपण वायरल करून काय साध्य केलं? आपल्या घरच्या कुटुंबातील बाप, बहिण, आई कुणाचा ऑडियो एवढ्या घाण रित्या आपल्याकडे आला असता तर आपण तो पुढे फॉरवर्ड केला असता का? यात खरा गुन्हेगार कोण? व्यक्ती मतभेद ही मानवी प्रक्रिया आहे पण आंबेडकरी चळवळीचे शत्रू होऊ नका, तिच्यात मतभेद करू नका.
सतर्क व्हा, सतर्कता नसेल, केवळ विकृत्ती असेल आणि त्यातला असुरी आनंद घेणारे महाभाग असतील तर चळवळ घायाळ होतेय, चळवळ जखमी होतेय हे लक्ष्यात घ्या, एकमेकांना जखमी करून आपला रथ पुढे जाणार कसा? आज चळवळीचे चारित्र्य धोक्यात आले आहे.
समाज निराशात जाऊ देऊ नका, समाजाचा कधीच काहीच दोष नाही, त्याला चळवळ जिवंत हवी आहे. ती जखमी करू नका! थांबवा सगळं, सगळी घाण डिलीट करा, आपल्या मोबाईलमधून आपल्या यूट्यूब चॅनेलवरुन उडवा, असं चळवळीचे चारित्र्य उध्दवस्त होऊ देऊ नका हीच अपेक्षा!
- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना