काँग्रेसच्या हरिजन सेवक संघटनेवर बंदीची मागणी; ‘हरिजन’ शब्द अपमानजनक, ऑल इंडिया पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा

मुंबई, २२ मे २०२५: काँग्रेस पक्षाने ‘हरिजन सेवक’ ही संस्था तात्काळ बंद करावी, अशी जोरदार मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केली आहे. ‘हरिजन’ हा शब्द अपमानजनक असल्याचा आरोप करत, या शब्दाचा वापर थांबवण्याची आणि संस्था बंद करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. काँग्रेसने ही मागणी गांभीर्याने न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि काँग्रेसचे कार्यक्रम उधळून लावले जातील, असा इशारा दिपक केदार यांनी दिला आहे.
दिपक केदार यांनी राहुल गांधी यांना उद्देशून सांगितले की, “हरिजन हा शब्द तुच्छतेची भावना दर्शवतो. काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.” त्यांनी पुढे मागणी केली की, राहुल गांधी यांनी तात्काळ ही संस्था बंद करावी आणि समाजातील सर्व वर्गांप्रती संवेदनशीलता दाखवावी.काँग्रेसकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
मात्र, या मागणीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया पँथर सेनेने काँग्रेसला अल्टिमेटम दिला असून, येत्या काही दिवसांत यावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.