अजित पवार यांच्यावर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची खोचक टीका!

मुंबई, २२ मे २०२५: ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हुंडा प्रथेला प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यावरून तीव्र टीका केली आहे.
एक्सवर व्यक्त केलेल्या आपल्या मतात केदार यांनी अजित पवार यांना प्रस्थापित राजकारणी संबोधत, त्यांच्याकडून सामाजिक परिवर्तनाची कोणतीही अपेक्षा नसल्याचे म्हटले आहे. केदार यांनी आपल्या टीकेत म्हटले की, “अजित पवार हे प्रथा पाळणारे प्रस्थापित राजकारणी आहेत. हुंड्याच्या कारची चावी देताना त्यांना काहीच वाटले नाही.
वैष्णवी गेली, याचाही त्यांना काहीच पडले नाही. त्यांना फक्त इतकेच म्हणायचे आहे की, ‘माझा याच्याशी काही संबंध नाही.’ आणि खरंच त्यांचा सामाजिक परिवर्तनाशी कधीच संबंध आला नाही.” पुढे त्यांनी म्हटले की, अजित पवार यांचे सहकार, अर्थ आणि राजकारण यापलीकडे काही दृष्टिकोनच नाही.
“जातीयता नष्ट व्हावी, प्रथा नष्ट व्हावी, सामाजिक परिवर्तन व्हावे, याचा आणि अजित पवार यांचा कधीच संबंध आला नाही,” असे केदार यांनी ठणकावले.
या टीकेनंतर दीपक केदार यांनी स्पष्ट केले की, त्यांनी अजित पवार यांच्याकडून कोणत्याही सामाजिक बांधिलकीच्या अपेक्षा ठेवलेल्या नाहीत. ही टीका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.