अग्रलेख: पवार पाठ बळ घेतोय बळी!

राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबातील सूनबाईंच्या छळाची आणि आर्थिक लूटमारीची घटना पुन्हा एकदा राजकीय पाठबळाच्या गैरवापराचा गंभीर प्रश्न उपस्थित करते. हगवणे कुटुंब आणि पवार गटाचे घनिष्ठ संबंध सर्वश्रुत आहेत. या संबंधांमुळे हगवणे यांना काहीशी बेलगाम हिंमत मिळाली, ज्याचा परिणाम म्हणून त्यांनी सूनबाईंवर अत्याचार आणि आर्थिक शोषण केले. पवार कुटुंबीयांना याची माहिती नव्हती, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. उलट, स्थानिक पोलिसांवर प्रभाव आणि महिला आयोगासारख्या संस्थांवर नियंत्रण असल्याच्या अविर्भावात हगवणे यांनी हे कृत्य केले. यामुळे राजकीय पाठबळाचा दुरुपयोग किती घातक ठरू शकतो, हे स्पष्ट होते.
पक्षाचे सरपंच रेंज रोव्हर घेतात, त्यांच्या मुलाखती माध्यमांत झळकतात, पण याचवेळी सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी साधेपणा आणि पारदर्शकता दाखवणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींच्या वागण्यातून समाजाला चुकीचा संदेश जाऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. पण, असे संदेश वारंवार समोर येतात, आणि त्यामुळे सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया मंदावते. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या कृतींतून सामाजिक जबाबदारी दाखवली पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही.
हगवणे प्रकरणात माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे प्रकरण दडपले गेले नाही. यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणातही माध्यमांनी आघाडी घेतली आणि राजकीय दबावाला बळी न पडता सत्य समोर आणले. यामुळे हगवणे यांना यापूर्वीप्रमाणे वाचणे शक्य झाले नाही. याचप्रमाणे, मुंडे प्रकरणातही पवार कुटुंबीयांनी दिलेले पाठबळ चर्चेत आले होते. मोठ्या पवारांनी स्वतः म्हटले होते की, “मुंडेंना मी कशाकशातून वाचवले, हे सांगितले तर पंचायत होईल.”
अशा विधानांमुळे तरुण पिढी राजकारणाकडे तुच्छतेने पाहू लागते.आमचे पवार कुटुंबीयांना आव्हान आहे की, अशा प्रकारचे बळ देणे बंद करावे. राजेंद्र हगवणे यांना वाटले की, पवार कुटुंबीय त्यांना वाचवतील, पण माध्यमांच्या दबावामुळे त्यांना तसे करता आले नाही.
आता वेळ आहे की, पवार कुटुंबीयांनी सामाजिक कार्य करणाऱ्या, लढणाऱ्या व्यक्तींना पाठिंबा द्यावा आणि समाजहिताला प्राधान्य द्यावे. राजकारण हे समाजसेवेचे साधन आहे, गुंडांना पाठबळ देण्याचे नव्हे. सामाजिक परिवर्तनासाठी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, अन्यथा जनतेचा विश्वास पूर्णपणे उडेल आणि राजकारणावरील तुच्छता वाढतच जाईल.
दीपक केदार ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष