“पँथरयौद्धा” विनोद भोळे वाघासारखा लढतोय…

पँथर जीवन जगायला काळीज लागत, पँथर म्हणजे निडर, रणांगणात मरण्याच्या तयारीने उतरलेला. विनोद भोळे हे नाव संघर्षाचं दुसर नाव आहे. कधीच डगमगला नाही, भीती चेहऱ्यावर दिसली नाही, शत्रूंनी माझ्यापासून तोडण्यासाठी खुप प्रयत्न केले पण गडी वाघासारखा माझ्यासोबत उभा राहिला लढत राहिला झुंज देत राहिला. या रस्त्यावर त्याने खुप संकटं बघितली. आंबेडकरी चळवळीला आपल देणं लागतय, पँथर पुन्हा उभा राहिला पाहिजे म्हणून त्याने संघर्ष केला.
विनोद भोळे आणि मी जे भोगले तो आमचा संघर्षाचा काळ अतिशय भयानक आहे. आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाला निर्माण करण्यासाठी आम्ही लढत राहिलो.
विनोद भोळे पिंगळी या छोट्या गावातील परभणी जिल्ह्यातील असून शेतमजूर कुटुंबातला कार्यकर्ता, जेमतेम परिस्तिथी, विनोद भोळेची पत्नी घरगुती बुटीक चालवून संसाराचा गाडा चालवत आहे. दोन लहान मुल आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी अशा अनेक समस्यांना विनोद भोळे तोंड देत असतात. कधीही रडत बसला नाही, नाजूक परिस्तिथीचे भांडवल केले नाही. परिस्तिथी पुढे गुडघे टेकले नाही. स्वाभिमानाने जगलेला हा पँथरयौद्धा आहे. शेतमजुराच्या या वाघाने क्रांतीच वादळ महाराष्ट्रात आणलय. लहानपणापासूनच चळवळीचं भयानक वेड, जिथे कुठे समाजाचा कार्यक्रम असेल तिथे विनोद भोळे जाणार सहभाग घेणार आणि योगदान देणार.
साधारण पाच वर्षांपूर्वी विनोद भोळेंचा मला कॉल आला, परभणीत वाढत असलेल्या अत्याचारावर तो बोलत होता. प्रेमळ स्वभाव, आपलेपण, मनमिळाऊ असा त्याचा स्वभाव आणि कार्यात प्रामाणिकता त्यामुळे मला हा गडी भावला. चळवळीत कार्यकर्ता हा कार्यकरता असला पाहिजे ते सर्व गुण विनोद मध्ये होते. मी जिथे जाईल त्या आधीच विनोद तिथे समोर हजर असायचा, असं एक दोन वेळा झाल्यावर मी विनोदला घेऊनच फिरायला लागलो. सुरवातीच्या काळात आमच्याकडे कार नव्हती. बस आणि ट्रेन ने आम्ही प्रवास करत असायचो. मला चांगलं आठवतय, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आम्ही पँथर सेनेची शाखा स्थापन करायला गेलो होतो. आशिष वानखेडे या तरुणाने ही शाखा स्थापन केली होती. मी आणि विनोद बसने गेलो होतो, बाळापुरच्या विहारात बसून राहिलो, कार्यकर्ता नवा होता पण उमेदी होता म्हणून आम्ही गेलो होतो. सायंकाळी 5 वाजता त्याने शाखा स्थापन केली. त्यानंतर आम्हाला निघायला उशीर झाला. बसस्टॉप वर आम्ही 2 तास उभा राहिलो, एक बस मिळाली त्या बसमध्ये आम्ही अक्षरशः उभा राहून आलो. विनोद भोळेची तळमळ मला जागा भेटावा म्हणून असायची त्याने जागा सुद्धा करून दिली पण पुन्हा एक वयस्कर आजी आली म्हणून मी उभा राहिलो.
पैसे नसायचे, जे भेटेल त्या वाहनाने गाव गाठायचे. माझ्या आधी आमचा विनोद पुढे हजर असायचा, सर्व नियोजन करायचा. अनुभवी असल्यामुळे त्याला चळवळीची सर्व जाणीव होती. मुंबईला अनेकदा मंत्रालयात निवेदन देण्यासाठी आलो ट्रेनने आम्ही दोघांनी जनरल डब्यातून प्रवास केला. उभा राहून निघायचो भाई आपण जिंकूया म्हणत धीर द्यायचा. माझा कॉल जाण्या आधीच त्याची बॅग रेडी असायची. त्याच्या उत्साहाने मला कधीच निराश केलं नाही. त्याच्या उत्साहामुळेच मी निर्माण झालो.
पुण्यात तर दोन पदाधिकारी देण्यासाठी आलो होतो. दोन किलोमीटर आम्ही पायी चाललो विनोद भोळे पुढे आणि मी त्याच्या मागे असे आम्ही निर्माण झालो.
अशा अशा घटना आमच्यासोबत घडल्या की त्या आम्ही मांडू सुद्धा शकत नाही. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त लिहायला घेतलं आणि तो सर्व प्रवास डोळ्यासमोर उभा राहील. लिहिता लिहिता थांबलो कारण डोळ्यात पाणी तरळले आहे, बाहेर पाऊस चालू आहे खिडकीतून बाहेर बघत बसलोय तो प्रवास उभा राहिलाय. पायाला भिंगरी बांधून नुसते पळत होतो, कधी एकमेकांना विचारलं नाही घरी काय सुरू आहे. घरदार सोडून आम्ही फिरत राहिलो. पीडितांचे रडणारे कॉल आले की आम्ही निघायचो. कित्येकवेळा विनोद भोळे आजारी पडला, ताप आला आणि अंगात मुरला पण कधी मला सांगितले नाही. कधीही हा वाघ नाराज झाला नाही, निराश झाला नाही मला सोडून गेला नाही. मला रोखण्यासाठी शत्रूंनी अनेक षडयंत्र करून विनोद भोळेला माझ्यापासून तोडण्याचा खुप प्रयत्न केला. कधी पदाची, कधी पैशाची, कधी फाईल करून देण्याची, कधी कॉन्ट्रॅक्ट करून देण्याची अनेक प्रलोभने दिली. भाई तुमच्यासोबत चालणार समाजासाठी लढणार आणि समाजासाठीच मरणार म्हणत सोबत चाललेला आहे.
परभणी आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे. या मुशीतून आलेला हा पँथरयौद्धा परभणी जिल्हाअध्यक्ष ते ऑल इंडिया पँथर सेनेचा महाराष्ट्र अध्यक्ष अशी त्याची कामगिरी राहिलेली आहे. शेकडो अत्याचारांना भेटी दिल्यात, शेकडो आंदोलनाचे नेतृत्व केलंय, 36 जिल्ह्यात त्याने संघटन मजबुत केलंय, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ, मुंबई, पुणे सर्व भाग पिंजून काढलाय. एवढा यशस्वी राज्य अध्यक्ष प्रस्तापित पक्ष संघटनेकडे सुद्धा नाही. तोंडपाठ पदाधिकारी आहेत, कुणालाही नावासहित ओळखण्याची बौद्धिक क्षमता आहे. संकटाना भापणारी आणि संकटात मार्ग काढणारी स्वभाववृत्ति त्याच्यात आहे त्यामुळे आम्ही सुरक्षीत पुढे निघालेलो आहोत.
आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वात विनोद भोळे या नावाचे खुप मोठे योगदान आहे. चळवळीत आलेला जिवंत पणा त्यासाठी या गड्याचा मोठा वाटा आहे.
गाजलेले आंदोलने :
• दलित अत्याचाराविरोधात विधान भवनावर धडक आंदोलन, त्यात अटक झाली.
• भिमाकोरेगाव स्तंभ कोरोनाच्या नावाखाली कैद होता, पास शिवाय जाऊ दिले जात नव्हते, नऊ बरिगेट हटवून स्तंभाला सलामी देण्यासाठी हजारो पँथर घेऊन जाण्यात मोठा वाटा आहे.
• दीक्षाभूमी खुली करण्यात सर्वात पुढे हा पँथरयौद्धा होता.
• चैत्यभूमीवर समाजाचे झालेले हाल त्याविरोधात बंड पुकारले, त्यात अटक झाली. 10 दिवस आर्थर रोड जेल भोगली
• वकिली शिकणाऱ्या अश्विनी सूर्यवंशीची हत्या लातूर येते झाली, तिला मारून पटरीवर टाकले. त्यावेळी लातूर मध्ये चार दलित हत्याकांड घडले होते. लातूरमध्ये 10 हजारांच्या वर लोकांचा मोर्चा काढण्यात आला. त्याचे नियोजन, नेतृत्व विनोद भोळे यांनी केले. या मोर्चानंतर 26 जणांवर गुन्हा दाखल झाला.
• लातूर मध्ये समाजाच्या 24 मागण्या घेऊन पुन्हा दुसरा मोर्चा सुद्धा काढण्यात आला. याही मोर्चा नंतर गुन्हा दखल झाला.
• हिवरा बुद्रुक येते मातंग समाजाच्या कुटुंबावर गाळपेरा केला म्हणून हल्ला झाला, त्यात वृद्धांचे हात मोडले. तात्काळ घटनास्थळी भेट दिली, विनोद भोळे यांनी जिल्हाध्यक्ष सोनाजी घडसे यांच्यासोबत भूमिका घेऊन माजलगाव मध्ये विराट मोर्चा काढला आणि मनुवादी प्रवृत्तींना इशारा दिला.
• चंद्रपूर तेलंगणा बोर्डरवर वणीखुर्ड येते एका बौध्द कुटुंबाला त्यात तीन महिला आणि एक वृद्ध पुरुष होता यांना भानामती करता म्हणत गावाच्या येशीवर डांबून मारलं तेंव्हा तात्काळ त्या दुर्मिळ भागाला भेट दिली आणि चंद्रपूर मध्ये मोर्चा काढून सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या त्यास भाग पाडले.
• बुकणवाडी उस्मानाबाद जिल्ह्यात पारधी समाजाच्या पप्पू काळेची हत्या केवळ शेतात लघवी केली म्हणून केली अतिशय दुर्मिळ भागात तांड्यावर भेट देऊन घटनेला राज्यव्यापी वाचा फोडली.
• नागपूरला 14 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार झाला तात्काळ धाव घेऊन या घटनेला राज्यव्यापी स्वरूप दिले आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा घेरले.
• घनसावंगी येते अनिकेत हत्याकांड घडले त्यावेळी हजारो पँथर घेऊन या घटनेला भेट देत राज्यव्यापी आंदोलन उभा केले. तात्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी दुसऱ्याचं दिवशी भेट दिली.
• खर्डा प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता, परभणी जिल्ह्यातील या घटनेने संताप निर्माण झाला होता. हजारो पँथर घेऊन गावात धडक देऊन समाजाची ताकद बुलंद केली. प्रस्तापित लोकप्रतिनिधी ला चॅलेंज केले आजपर्यंत कोणत्याच घटनेत आता प्रस्तापित जातीयवादी नाक घालत नाहीत.
• अंबिका चित्तोड येते बौध्द तरुणांवर चाकू हल्ला झाला, स्थानिक जातीयवादी आमदाराने तिथे अट्रोसिटी ॲक्टला चॅलेंज केले तिथेही आम्ही भिडलो, घटनास्थळी भेट देऊन या वादग्रस्त आमदाराला चॅलेंज केलं आजपर्यंत पुन्हा कधीच तो समाजाच्या वाट्याला गेला नाही. येथेही आमच्यावर कार्यवाही झाली.
• सातारा जिल्ह्यात होलार समाजाच्या मुलीवर अत्याचार करून तिला कंबरेला दगड बांधून विहिरीत फेकले तिथेही तात्काळ भेट दिली.
• माजलगाव सूर्डी नजिक गावात ९ वर्षीय मुस्लिम मुलीवर बलात्काराची घटना घडली, तात्काळ संघटनेनी भेट दिली. बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि पाठपुरावा केला अवघ्या तीन महिन्यात आरोपीला जन्मठेप झाली.
• अरविंद बनसोड हत्याकांड, प्रद्धुमन कांबळे हत्याकांड, विराज जगताप हत्याकांड, अश्विनी सूर्यवंशी हत्याकांड, नीलिमा अकोट अकोला हत्याकांड, अनेक चिमुरड्यांवरील अत्याचार अशा शेकडो घटनांना भेटी दिल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन घटनांना वाचा फोडली त्यांचे आंदोलने उभा केली.
• 3200 एसटी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत एसटी महामंडळावर अचानक आंदोलन केली.
• पश्चिम महाराष्ट्रात महापूराने थैमान घातले होते, त्या भागात पूरग्रस्त लोकांना भेटी दिल्या त्यांच्या समस्या मंत्रालयीन स्तरावर मांडल्या
• गेल्या वर्षी कोकणात आलेल्या महापुरानंतर त्या भागातील बौद्धांना सुरक्षीत ठिकाणी आसरा मिळावा म्हणून संघर्ष केला आणि त्यांना आसरा देऊनच आलोत.
• कोरोनाच्या काळात विनोद भोळे माझ्यासोबत जीव धोक्यात घालून फिरत असे, कोरोना काळात आंदोलने केले म्हणून अनेक ठिकाणी गुन्हे दखल झाले.
• विद्यार्थ्यांच्या न्याय हक्क अधिकारांचा लढा तीव्र करण्यासाठी राज्यभर समाज कल्याण कार्यालयावर परात भेजो आंदोलन करून धनंजय मुंडे च्या राजीनाम्याची मागणी केली. अनेक मूलभूत आर्थिक मागण्या यावेळी मान्य झाल्या.
• बौध्द, पारधी, मातंग, होलार, चर्मकार, मुस्लिम, आदिवासी अशा अनेक जातींच्या अन्याय अत्याचारावर आवाज उठवला आहे.
असे अनेक महान कार्य विनोद भोळे यांच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदाच्या नेतृत्वाखाली झाली आहेत. अनेक घटनांचा यात उल्लेख नाही या आठवल्या तेवढ्या घटना लिहिलेल्या आहेत. कार्याला खुप महत्व विनोद भोळेनी दिलेले आहे. कार्यात सातत्य आणि सक्रियता त्यामुळे संघटन मजबुत झाले आहे.
13 ऑगस्ट ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांचा वाढदिवस आहे. ऑल इंडिया पँथर सेना आपल्या या लढाऊ नेत्याचा वाढदिवस साजरा करतील. त्यांच्या नेतृत्त्वात पुढील वाटचाल अशीच चालू ठेवतील अशी आशा बाळगतो.
विनोद भोळे यांचे कार्य बघून पेटून उठतील आणि आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या लढ्यात सामील होतील. आजपासून विनोद भोळे आमच्यासाठी “पँथरयौद्धा” आहे. त्यांच्या कार्याला जयभीम!
पँथरयौद्धा विनोद भोळे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना
महाराष्ट्र | कर्नाटक | गुजरात | उत्तरप्रदेश | तेलंगणा | उत्तराखंड | गोवा