“धर्म आणि धांगडधिंगा” हेच प्रस्तापितांच्या निवडणूका जिंकण्या मागचे गणित आहे!

“धर्म आणि धांगडधिंगा” हेच प्रस्तापितांच्या निवडणूका जिंकण्या मागचे गणित आहे!
विदर्भात पुराने थैमान घातले आहे, मुलींवर बलात्कार हत्याकांड सुरू आहेत, महागाईने लोक घरात तडफडून मरत आहेत. बेरोजगार हताश, हतबल झाले आहेत, गुन्हेगारी वाढली आहे. शेतमजूर भूमिहीन मजूर उध्दवस्त झाला आहे. खाजगीकरण आधुनिक लीगल डाका टाकून खिसे मारत आहे.
आशावादी वातावरण कुठेच दिसत नाही तरी कुणी बोलत नाही. धर्म आणि धांगडधिंगा यावर जोर देऊन पुढारी निवडणुका जिंकतात त्यासाठी करोडो रुपये खर्च करतात. गरीब बहुजन धर्मापुढे झुकवला जातो, धर्माच्या नावाखाली लुटला जातो. धर्म उत्सवाच्या रोषणाईत सगळे प्रश्न विसरून जातो.
घरी जाऊन गळफास घेईल पण बोट उचलणार नाही एवढा या धर्माने त्याला बांधून टाकले आहे. मानसिक गुलामगिरीचे मेंढर आपोआप कधी थिरकतात त्यांनाही कळत नाही. मानसिक गुलाम केलेल्या बहुजनांना वाचवण्यासाठी महात्मा फुले, शाहू महाराजांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वस्व पणाला लावलं. बहुजन गरीबांच्या मानसिक गुलामाला गुलामीची त्यांनी जाणीव करून दिली. त्यातून समाज व्यवस्था त्यांनी बदलवली परंतु आज प्रतिक्रांतीने विजय मिळवायला सुरवात केली आहे. आजच्या काळात या गरीब बहुजनांच्या लूटमारीचा, धर्माच्या मानसिक गुलामगिरीचा खुलेआम अतिरेक होत असताना सगळे बघत आहेत एकही बंड करून उठलेला नाही. उलट या धांगडधिंग्याचा भाग कसं होता येईल याची राजकीय स्पर्धा लागावी हे तर खुप मोठं दुर्दैव आहे.
महापुरुषांच्या पगडी घालून मिरवणारे सुद्धा त्याच महापुरुषांच्या विचारांची हत्या करताना दिसतात. धर्मवेड्याच्या बाजारात हुलगे विकायला सगळे आले आहेत, जो जास्त धांगडधिंगा घालेल तोच हुलगे जास्त विकेल अशी अवस्था झालेली आहे.
धर्माच्या धांगडधिंग्यात रमलेल्या रसिकांनो असच मेंदु नसलेलं डारल घेऊन फिरा, कर्जबाजारी व्हा पण नाचा बरं का?
राजकारण्यांच एकही पोरगं त्या गर्दीत नाही, त्या जीवघेण्या नव्या घोषित झालेल्या खेळात नाही. रात्रंदिवस धर्म धर्म म्हणणाऱ्या एका पट्ट्याची लेक वैमानिक होण्यासाठी विदेशात गेली आहे. उद्योजकांचे पोरं ऊंच हवेतल्या बिल्डींगवर बसून गुलाम केलेल्या लोकांचे आत गेलेले ढोपर अन् खापाळी गेलेलं पोट बघून त्याला उत्साहाने नाचताना बघतात तेव्हा ते खुश असतात आणि नव्याने त्याला गुलाम करण्याचा अजेंडा ते रचत असतात.
राजकीय सत्ता याच धांगडधिंग्यातून येत असते, त्यामुळे विकासाची त्या विकासाच्या जाहीरनाम्याची अन् महागाई, अत्याचार, बलात्कार, आत्महत्या, बेरोजगारी यावर बोलणारे एक तर जेलमध्ये नाही तर गोळ्या घालून मारलेले दाभोळकर झालेले असतात. धर्माच्या धांगडधिंग्यामागे निघालेल्या मेंढरान, ठिकाणावर या…
- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना