अग्रलेख

लोकशाहीवर सामुहिक बलात्कार – कवी निलेश पवार

  २००२ साली गोध्रा जळीत हत्याकांडानंतर उसळलेल्या जातीय दंगलीत बिलकिस बानो या महिलेवर सामुहिक बलात्कार होतो, त्यावेळी त्या ५ महिन्याच्या गर्भवती होत्या. बिलकिस बानो यांच्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या केली जाते. त्यात त्यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलीलाही निर्दयपणे ठार केलं जातं. मानवाधिकार आयोगात धाव घेतल्यानंतर प्रकरणाची सीबीआय चौकशी होते, २००८ साली ११ आरोपींना जन्मठेप होऊन त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातही जन्मठेपचा निर्णय कायम ठेवला जातो‌. त्यानंतर आरोपींचे वय, त्यांनी भोगलेली शिक्षा व आरोपींची वागणुक अश्या सबबीखाली आरोपींना दया दाखवून जन्मठेपेतून‌ सुटका केली जाते. आरोपी बाहेर आल्यानंतर मिठाई वाटून आनंद साजरा होतो, त्यांचा सत्कार होतो. एका सामूहिक बलात्काराने पीडित भगिनीला न्याय नाकारला जातो तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट २०२२....

    देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी देशाभिमानाने उर भरून येत असताना त्याच दिवशी असा निर्दयतेचा आणि अन्यायी निर्णय देणे हि या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. बिलकिस बानोचा सामुहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांची मुक्तता करणं हा केवळ एका महिलेवर अन्याय नसून न्यायव्यवस्थेकडून लोकशाहीवर झालेला बलात्कार आहे, न्यायाचा खून आहे असे मी मानतो. 

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी हरघर तिरंगा अभियान राबवणारे मा. प्रधानमंत्री साहेब... बघा आमचे स्वातंत्र्य... स्वातंत्र्य दिनाला दिला जाणारा हा निर्णय आम्ही आजही स्वातंत्र्य नाहीत याची आम्हाला प्रकर्षाने जाणीव करून देतो. विष पाजून मारली गेलेली दीक्षा, पाण्याच्या घोटासाठी क्रुरपणे मारला गेलेला इंद्रजीत, कोल्हापुरातील वर्षा कांबळे, नाशिक मधील बलात्कार पिडित ९ वर्षाची चिमुरडी असे शेकडो अत्याचार आमच्यावर रोज होताय. माणूस म्हणून ज्यांना जगण्याचं स्वातंत्र्य नाही त्यांनी नेमके कोणत्या स्वातंत्र्याचे गोडवे गायचे? 

     दररोज होणारे अन्याय अत्याचार बघून चळवळीत काम करणाऱ्या काहींचे मन तीव्र वेदनेने विव्हळते आणि सोबतच काही लोक न मिळालेलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपडत आहेत. परंतु या बहुजन समाजाला जर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हवे असेल तर बीजेपी सारख्या जातीयवादी पक्षावर बहिष्कार टाकणारी क्रांतिकारी प्रतिज्ञा करणे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. बहुजन समाजातील दिशाहीन नेत्यांबरोबर गटातटाच्या स्वार्थी राजकारणासाठी निळ्या झेंड्याला टराटरा फाडणारे आमचे नेते आमचा मायच्या फाटलेल्या अब्रूसाठी जबाबदार आहेत. परंतु सोबतच या समाजाला नेत्यांची बेकी सांगताना शेवटी बहुजननायक मा. कांशीराम साहेबांचे एक वाक्य आवर्जून सांगावेसे वाटते, "तुम्हे अगर ना बिकनेवाला नेता चाहिये तो पहले तुम्हे ना बिकनेवाला समाज बनना होगा..!" मी कुठल्याही राजकीय पक्षाचा समर्थक अथवा विरोधक नाही फक्त समाजातील कोणत्याही माऊलीची बिलकिस बानो होऊ नये व कोणतीही बिलकिस बानो ही खैरलांजीतील भोतमांगेसारखी न्यायाच्या प्रतीक्षेत मरू नये येवढीच प्रामाणिक तळमळ....! 

कवी- निलेश पवार

ऑल इंडिया पॅंथर सेना
ग्रामीण जिल्हाध्यक्ष जळगाव

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!