सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेची रक्कम तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात याव्यात – पँथर स्टूडेंट फेडरेशन

धुळे : सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या अनुसूचित जाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारमार्फत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी या योजनेमार्फत अर्थसहाय्य केले जाते, त्यामुळे सदर योजना ही या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु दुर्दैव हे की, सदर योजनेच्या कायमच्या अनियमिततेमुळे प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षीही योजनेवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांना संकटांना तोंड द्यावे लागते.
आजच्या घडीला महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार योजनेचा दुसरा टप्पा वितरित झालेला नाही, बरेच विद्यार्थी गेल्या दीड वर्षांपासून योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत, सामाजिक न्याय विभागामार्फत अद्यापही पात्र-अपात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. शेतकरी, शेतमजूर, कामगारांची मुले या स्वाधार योजनेवर अवलंबून आहेत. शासनाकडून या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची स्वाधार योजनेची रक्कम अदा न केल्यामुळे विद्यार्थी हतबल झाला आहे, तो आर्थिक संकटामध्ये ढकलला गेला आहे, परिस्थिती हलाखीची असल्याने हे विद्यार्थी सध्या शिक्षणापासून वंचित राहण्याचा मार्गावर आहेत.
सरकारने व सामाजिक न्याय विभागाने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उध्वस्त होण्याची वाट पाहू नये. सरकारला विनंती आहे अनुसूचित जाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आर्थिक नाकेबंदीचे पाप आपल्याकडून करू नका, हे विद्यार्थी भिक मागत नसून त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मागत आहे.
पॅंथर स्टूडेंट फेडरेशनच्या मागण्या :
१) स्वाधार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी.
२) बऱ्याच विद्यार्थ्यांना गेल्या दीड वर्षांपासून योजनेचा लाभ मिळालेला नाही, यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी.
३) स्वाधार योजनेतील किलोमीटरची जाचक अट शिथिल करण्यात यावी.
४) स्वाधार योजनेची रक्कम ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी.
५) स्वाधार योजनेच्या वितरणामध्ये नियमितता आणावी.
६) अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेच्या जागांमध्ये वाढ करून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी २०० जागांकरिता शिष्यवृत्ती लागू करावी.
७) पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपमध्ये महागाईनुसार वाढ करण्यात यावी.
८) अनुसूचित जातीच्या पदवीधर विद्यार्थ्यांना व्यवसायाकरिता विनाअट कर्ज उपलब्ध करून द्यावे.
९) सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांची संख्या वाढवण्यात यावी.
वरील मागण्यांवर गांभीर्याने व तात्काळ कारवाई करण्यात यावी व्हावी , अश्या मागण्याचे निवेदन धुळे जिल्हा समाज कल्याण आयुक्त यांना दिलेले आहे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते यांनी दिलेला आहे…
यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते , धुळे पँथर स्टूडेंट फेडरेशन जिल्हा अध्यक्ष आकाश घोडे , धुळे जिल्हा महासचिव आनंद दादा अमृतसागर , जिल्हा सल्लागार अशोक दादा करंजे, धुळे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बळसाणे, धुळे शहर संघटक जितेंद्र भदाने, धुळे जिल्हा उपाध्यक्ष गोरख अहिरे, शिंदखेडा तालुका युवा अध्यक्ष समाधान मगळे, धुळे जिल्हा सरचिटणीस सलमान भाई खान, धुळे ग्रामीण संघटक विशाल वाघ धुळे जिल्हा संघटक पुरुषोत्तम केदार व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…
ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा युनिट