संघटनेतून माध्यमात पाऊल ठेवतांना………

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात संघटनेच्या माध्यमातून शोषीत, पिडित, वंचितांचा जन आक्रोश, डरकाळी करतांना तत्कालीन मनुवादी विचारांच्या व्यवस्थेने बरबटले असताना आपला न्यायीक लढा, संघर्ष प्रखरतेने करीत होते. मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा आंदोलक लढा शेवटच्या टोकात राहणाऱ्या गोरगरीब, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नव्हता. कारण हा लढा, संघर्षाचा बुलंद आवाज करणारी जी माध्यमं होती ती शेंडी वाल्यांच्या काळ्या टोपीत गुंडाळलेली होती. पिडितांचा आवाज, त्यांचा आक्रोश इथली माध्यमं व्यवस्थेने माखलेली, लुळीपांगळी झाली होती. अशा पिडित, शोषित, दलीत, आदिवासीचा आवाज, डरकाळी करतांना मोठ्या अडचणी बाबासाहेब आंबेडकरांना जाणवू लागल्या. म्हणून दलित, शोषित, आदिवासी, पिडितांचा आवाज बुलंद करायचा असेल, आपलं दुखणं शासन, प्रशासन व जनतेपर्यंत पोहचवायचे असेल तर संघटना असो वा चळवळ असो यांचा आवाज मांडण्यासाठी स्वतंत्र मुखपत्र असणे गरजेचे आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मुखपत्र काढली. या मुखपत्र माध्यमातून संघटनेचा, चळवळीचा जिवंतपणा, चळवळीचा एल्गार, व्यवसेविरोधात संघर्षाची भुमिका सातत्याने मांडली. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या संघटनेला चळवळीला मुखपत्र नसते तिची अवस्था पंख नसलेल्या पक्ष्याप्रमाणे असते. हे बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य तंतोतंत आजही खरे ठरते आहे. याची जाणीव या देशात स्वतःच्या कुटुंबाला सोडून पायाला भिंगरी बांधून शोषित, पिडित, दलित, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी यांची ढाल बनुन संघर्ष करणारे संघर्ष नायक अॉल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनाही झाली. कारण या देशात दलित, आदिवासी, मातंग, समाजाला इथली व्यवस्था दुय्यम मानत असून या समाजावर हल्ले, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच आयुष्य बरबाद करण्याचं कटकारस्थान करित आहे. या मनुवादी विचारांच्या व्यवस्थे विरोधात सातत्याने अॉल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून जशास तसे म्हणून दिपकभाई केदार डरकाळी करीत देशभर संघटन उभं करीत आहेत. या संघटनेचा पदाधिकारी, कार्यकर्ता अन्याय, अत्याचार विरोधात व्यवस्थेशी आज दोन हात करुन जयभीम चा नारा देत एल्गार करतोय. हा एल्गार इथली मिडीया, माध्यमं पिडितांचा आवाज बुलंद करतांना दिसत नाही. या देशात परत गुलामीची व्यवस्था होत आहे. इथला दलित, आदिवासी, मातंग हा सुरक्षित राहिला नाही. इथल्या पिडितांचा आवाज बुलंद करण्यासाठी बंड करणाऱ्यांना व्यवस्था षंड करण्याचे कारस्थान करीत आहे. परंतु जयभीम चा नारा देत अॉल इंडिया पँथर सेनेचा इथला कार्यकर्ता या मनुवादी व्यवस्थेच्या छातकाळात लात मारत, नपुंसक झाल्यागत मिडियाला आगेकूच करित पिडित, शोषित, वंचितांचा आवाज होत आहे. ह्याची देशभर ठिणगी पडावी म्हणून अॉल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी संघटनेचे मुखपत्र व्हावे म्हणून मुखपत्राच्या दुनियेत पाऊल ठेवून अॉल इंडिया पँथर सेना संघटनेचे मुखपत्र म्हणून “पंथरनामा” या डिजिटल मिडियातून संघर्ष करण्यास सुरवात केली आहे. नक्कीच या मुखपत्रातून पिडित, शोषित, वंचित घटकांचा एल्गार, संघर्ष जनतेपर्यंत पोहोचेल व नव्या क्रांतिची पहाट नक्कीच होईल. अॉल इंडिया पँथर सेनेच्या “पँथर नामा ” या मुखपत्र पाऊलातून लढण्याचे बळ नक्कीच मिळणार ही सार्थक आशा आणि अगणित शुभेच्छा…
रुपेश निमसरकार
जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर
मो.नं.९८५०२७५४३९