घोटवडे चा पुल मोजतोय अखेरचा घटका…..

पाली / बेनसे : सुधागड तालुक्यातील घोटवडे येथील गावाला व आदिवासी वाड्या वस्त्यांना जोडणारा तसेच वाहतूक दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पुलाची अवस्था दैनिय झाली आहे. या पुलाची दुरुस्ती व मजबुतीकरण होणे गरजेचे आहे. परंतु अश्या धोकादायक पुलाच्या देखभाल व दुरुस्तीकरीता कोणत्याही प्रकारचा निधी शासनाकडून उपलब्ध होत नसल्याने प्रशासन व सरकार पुल कोसळून मोठी जीवित हानी घडण्याच्या प्रतीक्षेत आहे का असा सवाल स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे.
धोकादायक पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना सुधागड – रायगड यांच्याकडून करण्यात आली आहे. अन्यथा येत्या १३ सप्टेंबरला जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष संदेश भालेराव व सहसचिव आवेश भालेराव हे अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा तहसीलदार दिलीप रायन्ना यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी पाली पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले DYSP किरण कुमार सूर्यवंशी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.
घोटवडे पुल हा परळी गावासह मुख्य बाजारपेठ व पाली खोपोली राज्य मार्गाला जोडणारा दुवा मानला जातो. सदर पुल धोकादायक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून या पुलावर वाहनासह पूर्णपणे बंदी असल्याचे फलक संबंधित प्रशासनामार्फत पुलाच्या जवळ लावण्यात आले होते. परंतु आज ते सूचना फलक गंजलेल्या अवस्थेत असून मोडून पडले आहे. यामुळे या धोकादायक पुलाबाबत प्रशासन किती संवेदनशील आहे याची प्रचिती येते. दरम्यान घोटवडे पुलाची तातडीने दुरुस्ती व्हावी व भविष्यातील संभाव्य धोका टळावा याकरिता पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेणेकडून करण्यात आली.
त्यावेळी उपस्तीत ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, सुधागड तालुका अध्यक्ष संदेश भालेराव व अन्य पँथर पदाधिकारी उपस्थित होते…