औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक: ऑल इंडिया पॅंथर सेना स्वबळावर लढणार, तरुणांना संधी देणार!

औरंगाबाद: ऑल इंडिया पॅंथर सेनेने आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. सुभेदार विश्रामगृह येथे नुकत्याच झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचे आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी जनजागृती करण्याचे ठरले.बैठकीत युतीच्या शक्यतेवरही चर्चा झाली.
स्वाभिमान आणि सन्मानाला प्राधान्य देत युतीसाठी तयार असल्याचे सेनेने जाहीर केले, परंतु सध्या स्वबळावर निवडणुकीची तयारी करण्यावर भर देण्यात आला. यासाठी ‘पॅंथर जनजागरण अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शिक्षण, आरोग्य, मूलभूत हक्क, निवारा यांसारख्या मुद्द्यांवर लोकांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच, मताचे महत्त्व आणि सर्वांगीण विकासासाठी जनजागृती केली जाणार आहे.
महाराष्ट्र महासचिव सचिन तिवारी यांनी यावेळी या बैठकीत सांगितले की आपण तरुणांना संधी दिली पाहिजे. महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटी दादा सदाशिव यांनी सांगितले की, “ऑल इंडिया पॅंथर सेना स्वबळावर निवडणूक लढेल आणि शोषित वर्गाच्या प्रश्नांना प्राधान्य देईल.”
बैठकीला जिल्हाध्यक्ष अमोल शेजवळ, युवा जिल्हाध्यक्ष अविनाश हिवाळे, शहराध्यक्ष कुणाल दांडगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांना बैठकीचा आढावा देण्यात आला असून, लवकरच ते औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका जाहीर करतील, असे सेनेच्या प्रवक्त्याने सांगितले.



