सामाजिक

बौध्द वस्तीवर 150 जणांचा हल्ला; महिला तरुण जखमी, परभणी बोरीतील घटना!

परभणी : काल रात्री 8 वाजता रस्त्यावरील किरकोळ भांडणानंतर कसलीही शहानिशा न करता बोरी गावातील प्रबुद्धनगर बौध्द वस्तीवर जवळपास 150 जणांनी सशस्त्र हल्ला केला.

लाठ्या काठ्याने भयानक मारहाण केली, हल्लेखोर सवर्ण असून धुळवड सणाच्या संध्याकाळी ही घटना घडली. हल्लेखोर दारू आणि अनेक नशा केलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलांना नाल्यात पाडून मारले, तरुणांना गंभीर जखमी केले. बौध्द वस्तीत अचानक घुसून केलेला हल्ला हा सुनियोजित होता. पोलीस प्रशासन वाचवायला आले नाही, तात्काळ कोंबिंग करून आरोपींना अटक केली नाही.

बोरी पोलीस स्टेशन एपिआय सरला गाडेकर यांची भूमिका संशयास्पद आहे. अद्याप त्यांनी कुणावरही कार्यवाही केली नाही उलट भीमसैनिक यांना टार्गेट करण्याचे काम त्या करताना दिसत आहेत. रात्री 8 वाजता घटना घडली रात्री 1 पर्यंत बौध्द महिला पोलिस स्टेशनला बसून होत्या, तरीही एफआयआर झालेली नाही.

आज सकाळी संपूर्ण सवर्ण गाव एकत्र आले आणि त्यांनी मार्केट बंदची हाक देत अनुसूचित जातीच्या तरुणांना अटक करण्याची मागणी करत मोर्चा काढला. अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही रोखण्यासाठी दबावतंत्र वापरले. या मोर्चात जातियवादी घोषणा देण्यात आल्याचे समजते. मोर्चामुळे दलित समाजात दहशत पसरली आहे. मार खाल्ला, हल्ला झाला, आया बहिणींना मारहाण झाली तरीही न्याय नाही, आरोपी मोकाट आहेत आणि उलट जखमी विरोधात कार्यवाही आणि मोर्चा निघतोय.

भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा हा मतदार संघ आहे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दबाव आणत असल्याचे उघड झाले आहे. सत्ताधारी आपल्या सत्तेची मस्ती दाखवतोय आणि दलितांचा कोंडमारा करतोय.

या भागात दलित पुढारी आहेत ते मोबाईल बंद करून बसले असल्याचे भीमसैनिक रडत रडत सांगत आहेत. कुणी राष्ट्रवादी, कुणी भाजप तर कुणाला बहुजनांना दुखवायचे नाही, कुणाला सत्ता एवढी महत्वाची झाली की समाजाचं मत त्यांना हवं आहे पण त्यांचं रक्त बघायचं नाही. सत्तेसाठी समाजाचं रक्त दिसत नसेल तर दुर्दैवी आहे. त्यामुळे समाज एकाकी पडला आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी डीवायएसपी यांच्याशी फोनवरून संवाद साधून आरोपींना अटक करण्याची व समाजाला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. लाईव्ह च्या माध्यमातून घटनेला राज्यव्यापी स्वरूप दिले आहे. महिलांना मारहाण झाली, तरुणांना रक्तबंबाळ केले त्यामुळे तात्काळ 307, 354, अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही झाली अशी मागणी त्यांनी केली. ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांनी स्थानिक पोलिसांना धारेवर धरून समाजाच्या रक्षणासाठी दबाव आणला, जिल्हा अध्यक्ष निवृत्ती वाघमारे व राज्य अध्यक्ष तत्काळ पोलीस अधीक्षक परभणी यांच्याकडे निवेदन घेऊन निघाले आहेत. संपूर्ण गावाने एकत्र येऊन अशा हल्ला करणे, मोर्चा काढणे ही मोठी हुकुमशाही दादागिरी झुंडशाही आणि गुंडशाही आहे.

राज्य सरकार विरोधकांनी दलित अन्याय अत्याचार दुर्लक्षित करण्याचा अघोषित ठराव केलेला दिसतो. विरोधी पक्षनेते अजित पवार मंत्रिमंडळात एकही महिला नसल्याची खंत व्यक्त करतात पण दलितांवर हल्ले सुरू आहेत, दलित हत्याकांड होत आहेत याची त्यांना खंत वाटतं नाही. ते यावर आवाज उठवत नाहीत. विधानसभा अधिवेशनात आमचा मुद्दा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही पण निळा रुमाल गळ्यात घालून चिंचवड कसबा निवडणुकीत फिरलेले सगळे अन् त्यांचे प्रमुख अजित पवार असे वागतील वाटलं नव्हतं अशी खंत सुद्धा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्यक्त केली.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!