आंबेडकरी समाजाला गाव सोडावे लागले!

नुकताच हंगेरी देशातल्या रोमा या शोषित समाजातील युवकांची भेट घेतली जे आपल्या समाजाच्या उत्थानासाठी डॉ. आंबेडकरांचा विचार स्वीकारत आहेत, त्यांचा आदर्श पुढे ठेऊन शिक्षण घेत आहेत तर दुसरीकडे भारतात काल रात्री गडचिरोली जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या फलकामुळे निर्माण झालेल्या वादात आंबेडकरी समाजाला गाव सोडावे लागले. एकीकडे आशावादी चित्र दिसते, तर दुसरीकडे गडचिरोलीतली घटना प्रचंड अस्वस्थ करून जाते.
गडचिरोली जिल्ह्यातल्या नवरगावातील आंबेडकरी समाजातील छप्पन कुटुंबांनी काल रात्री गाव सोडले. आपली लहान लेकरं, घरच्या वृद्दांना घेऊन संपूर्ण सामानासह, बैलगाड्यांवर आणि पायी चालत या कडाक्याच्या थंडीत गडचिरोली शहराकडे निघाले. गावात बाबासाहेबांच्या नावाचे फलक लावल्याने एका वर्षापासून दोन गटात वाद सुरु होता. आंबेडकरी समाजाने न्यायालयीन लढाई लढून हा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न केला पण काल रात्री प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना देखील पोलीस (पॅरामिलिट्री) बळाचा वापर करून गावातील बाबासाहेबांच्या नावाचे फलक काढून टाकण्यात आले. छोट्याश्या खेड्यात जवळपास दोनशे हुन अधिक पोलीसांचा बंदोबस्त होता. आंबेडकरी समाजाच्या प्रत्येक घरासमोर पोलीस तैनात होते. प्रचंड भीतीदायक वातावरणात काल रात्री त्यांना गाव सोडावे लागले. रात्री गावाजवळील नदीजवळ थांबून आपल्या बैलगाड्यांनी आज गडचिरोली शहर गाठले. चळवळीतल्या लोकांनी त्यांची संपूर्ण व्यवस्था केली. पण गडचिरोली शहरात ते पोहचताच सशस्त्र पोलीस पुन्हा बंदोबस्त तैनात करण्यात आला. चळवळीतले कार्यकर्ते, संघटनांना या प्रकरणात दखल देऊ नये, अन्यथा कारवाही करून ताब्यात घेण्याचा धाक प्रशासनाने दिला आहे. लोक लढत आहेत. प्रशासकीय आवारात लोक बसले असतांना त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस तैनात केले असल्याचेही समजले. व्यवस्थेच्या नजरेत कमजोर असलेल्या या समाजाची इतकी भीती का वाटते की ज्यासाठी मोठ्याप्रमाणात अनावश्यक पोलीस बंदोबस्त करावा लागतोय. दंगली घडविण्याचे आरोप प्रशासन चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर करत आहे. तेव्हा निवडणुकीच्या तोंडावर हा डाव व्यवस्थेचाच तर नाही ना हा ही प्रश्न पडतो?
गावे कितीही चांगली वाटत असली तरी तिथेच जास्त जातीवाद भरलेला असतो. इथे विरोध करणारा समाज तसा उच्चवर्णीय नाही, पण जातीवादी व्यवस्थेने धर्माच्या नावाखाली त्यांना कायम गुंतवून ठेवलं आणि त्यांच्या पर्यंत समतेचा विचार जाणीवपूर्वक पोहचूच दिला नाही आणि त्यामुळे जातीवादी मानसिकता आणि डॉ. आंबेडकरांबद्दलचा द्वेष त्यांच्यात रुजत गेला. पण याच विचारात त्यांचाही विकास दडलेला आहे हे त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि सोबतच त्यांचा शोषक कोण आहे हे सुद्धा त्यांना ओळखणे गरजेचे आहे.
या गावातील वादाला एक वर्षाहून अधिक काळ लोटत असतांना सुद्धा प्रशासनाने एकदाही सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मीटविण्याचा प्रयत्न केला नाही. एक वर्ष आंबेडकरी समाज हा अन्यायाविरोधात शक्य त्या मार्गाने लढतच होता. पण काही स्थानिक लोकप्रतिनिधि फलकाला विरोध करणाऱ्यांच्या पाठीशी उभे होते. प्रचंड दडपशाहीचे वातावरण काही वर्षात गडचिरोली भागात निर्माण झाले आहे. पूर्वी जातीभेदाचे प्रकार एवढ्या प्रकर्षाने दिसत नव्हते पण आता त्यांनी जोर धरला आहे. जिल्ह्याकडे ढुंकूनही न पाहणारी नेते मंडळी, आता खनिज संपत्ती सापडल्यापासून विकासाच्या नावावर लोकांच्या जीवाशी खेळत आहेत आणि एकूणच सामाजिक परिस्थिती पूर्णपणे दूषित करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. पोलीस बळाचा वापर करत आंदोलने, मोर्चे सर्रासपणे मोडून टाकण्यात येत आहेत, या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे, त्यांच्यावर नजर ठेवण्याचे, फोन टॅप करण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पण आपल्याला एकत्रित येऊन लढावचं लागेल. आज प्रशासनासोबतच्या चर्चेतून काहीही साध्य न झाल्याने, नवरगावातील आंबेडकरी समाज आपल्या भूमिकेवर ठाम आहेत तेव्हा त्यांच्यासोबत उभं राहणे अत्यंत गरजेचं आहे.
- बोधी रामटेके, फेसबुक पोस्ट