हिवाळी अधिवेशनावर निळा जनउठाव मोर्चा धडकणार!
नागपूर : अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त, आदिवाशी समूहांच्या सामाजिक, मूलभूत, आर्थिक, महापुरुषांच्या अस्मितेसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वात नागपूर हिवाळी अधिवेशनावर निळा जनउठाव मोर्चा धडकणार आहे. समूहांच्या ५० मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार असून महाराष्ट्रातून पँथर्स नागपुरात येणार आहेत. गेल्या अडीच वर्षात राजकीय तमाशांपलीकडे महाराष्ट्राने काहीही पाहिलेले नाही. महाराष्ट्रात जातीय अत्याचाराने थैमान घातले असून सरकारच्या नाकाखाली जातीयवादी बोकाळले आहेत. अनुसूचित जाती जमाती आदिवासी असुरक्षित आहेत. महापुरुषांच्या अस्मिता धोक्यात आल्या आहेत. गायरान, घरकुल, बेरोजगारी, महागाई, अपंग, कामगार, शेतकरी, शेतमजूर, छोटा उदयोजक यांच्या मूलभूत प्रश्नासाठी एक निळा बंड असल्याचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांनी कळवले आहे.
हजारोंच्या संख्येने मोर्चात सामील व्हा असे आवाहन विदर्भ अध्यक्ष दादाराव ढोले, विशाल तांबे, शुभम गोंडाणे, पवन राऊत यांनी केले आहे. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात तरुण येणार असल्याचे त्यांनी सांगितले.