दलित अत्याचार विरोधात आझाद मैदानातून पँथर एल्गार!

मुंबई : ऑल इंडिया पँथर सेनेनी आझाद मैदान येते निळा जनउठाव मोर्चाच्या नावाखाली दलित अत्याचार, गायरान जमीन, स्वतंत्र बजेट कायदा असे 38 मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन केले.
यावेळी दिपक केदार यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. पँथरचा दरारा कायम आहे, म्हणूनच मुख्यमंत्री काय कोणताच मंत्री पँथरला फेस करू शकत नाही. धर्म जात बघून न्याय मिळतोय. कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळाला कारण तिथे फास्ट ट्रॅक कोर्ट लावलं. खैरलांजी ते बोंढार हजारो बळी गेले एकही प्रकरणात फास्ट ट्रॅक लावलेलं नाही. गायरान जमिनीच्या नोटीस दिल्या जातात, आमचा निधी लाटला जातो यासाठी स्वतंत्र बजेट कायद्याची तरतूद झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
अखेर त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की आता सभागृहात पँथर असल्याशिवाय आपला आवाज बुलंद होणार नाही. त्यासाठी कामाला लागा आणि व्यवस्था परिवर्तनासाठी सज्ज व्हा. एक पँथर सगळ्याला भारी पडेल. पँथर चळवळ जिवंत ठेवा, पँथर चळवळच आपल्या आया बहिणींचे रक्षण करू शकते. दुसरं कुणीही ती धमक दाखवू शकत नाही, आपण जिंकलो आपण काहींनी संपवलेला पँथर पुन्हा जिवंत केला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आम्हाला सिरियस व्हाला लावू नका. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न येते केला, आमच्या कार्यकर्त्याला गाडीत कोंबले याचा परिणाम भोगावा लागणार आहे. मुंबईत दडपशाही कराल तर याद राखा तुम्हाला राज्यात फिरायचे आहे. आंदोलकांचा आवाज दाबणे महागात पडेल. याद राखा, सांगून आलोय, अचानक येईला वेळ लागणार नाही. अशा गर्भित इशारा सुद्धा त्यांनी दिला.
या मोर्चाचे आयोजक मुंबई प्रदेश अध्यक्ष संदेश वाघचौरे, मुंबई उपाध्यक्ष संतोष गायकवाड, कार्याध्यक्ष मनोज खाडे, मुंबई सचिव स्वप्नील गंगावणे इत्यादी मुंबई कार्यकारिणीने केले होते.
राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी या आंदोलनाला उपस्थित होते. यावेळी अनेकांनी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र प्रवक्ते बंटी दादा सदाशिवे यांनी सरकार धार्मिक तेढ निर्माण करत असून हुकूमशाही रुजू करत असल्याचे मत व्यक्त केले. आता आपल्याला संघटित होऊन समाज रक्षणाचा आवाज बुलंद करावा लागेल असे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केले.
उस्मानाबाद ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अशोक कसबे यांनी घणाघात हल्लाबोल केला. त्यांनी या व्यवस्थेला सज्जड इशारा दिला. पोलिसांना पुढे करून आम्हाला रोखत असाल तर याद राखा एकदिवस ही व्यवस्था आमच्या ताब्यात आल्यावर तुमची खैर नाही. लोकशाहीत काहीही होऊ शकते, आमचे नेते दिपकभाई केदार उद्या गृहमंत्री झाले तर याद राखा, पोलिसांनी एवढं अती करू नये. समाजासाठी जगणं आणि समाजासाठी लढत मरणे हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे आमच्या नादी लागू नका, आमचे जातीच्या नावाखाली मुडदे पडत आहेत त्यावर बोला.
महाराष्ट्र सचिव भीमराज गोटे यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी व्यवस्थेची चांगली कानउघडणी केली. दलित अत्याचार, गायरान जमीन यावर त्यांनी आपली भूमिका मांडली.
महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा संपन्न झाला.